Wednesday, 14 September 2016

मी नास्तिक आहे.


मी नास्तिक आहे. कारण भारतीय घटनेने मला तो पर्याय निवडण्याचा अधिकार दिलेला आहे.
म्हणूनच माझ्या धर्माचे खरे नाव- ‘मानवता धर्म' असे आहे.
दुःख, संकट, आजार हे सगळे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा देव-धर्म, पाप-पुण्य, आत्मा-पुनर्जन्म याच्याशी काहीही संबध नाही. वैज्ञानिक प्रगतीने यातील बऱ्याच गोष्टी कमी केल्या आहेत, पुढेही कमी होत जातील. परंतू माणूस स्वतःच्या अविवेकीपणामुळे त्यात वेगाने भर घालत आहे.त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुता,न्याय या व अशा मुल्यांची जपणूक व पुरस्कार करून विवेकी समाजाकडे वाटचाल करणे, हा माझ्या नास्तिकत्वाचा गाभा आहे,असे मी मानतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र, संचार स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार आहेत.परंतू त्याने इतरांच्या अधिकारांवर आक्रमण होता कामा नये, ही मूलभूत अट आहे. म्हणून जेव्हा एखादा समूह वायू, जल, ध्वनी,विचार, आचार प्रदूषण करतो. सामाजिक स्वास्थ बिघडेल अशी कृती करतो,तेंव्हा त्याचा प्रतिकार करण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे.
देव-धर्म या व्यक्तीगत बाबी असल्याने त्या जर समाजाच्या मुठभर स्वार्थी लोकांनी शोषणासाठी वापरल्या तर त्यांची चिकित्सा करणे हा माझा अधिकार आहे, हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. तसेच मला इतर धर्मांच्या प्रभावाची व लोकसंख्येची भीती वाटत नाही.
खरेतर माझ्या मते देव-धर्म ही कालबाह्य संकल्पना आहे.१९८१च्या जनगणनेत निधर्मी लोकांची संख्या दिड लाख होती,ती २०११ च्या जनगणनेत 29 लाख झाली आहे.म्हणूनच मला धर्म चिकित्सेबरोबरच वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती यांचा विकास करणे हे जास्त महत्वाचे कर्तव्य वाटते. लोकांतील चिकित्सक वृत्तीचा विकास केला म्हणजे लोक त्यांच्या त्यांच्या धर्माची चिकित्सा करतील.
शस्त्रांच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहता विचार हे सर्वांत आधुनिक शस्त्र आहे; असे मला वाटते.सर्वच दहशतवादी लहान मुलांना, तरूणांना भावनिक आवाहने करून त्यांचे विचाराचे शस्त्र बोथट करत असतात व बंदुक हेच योग्य शस्त्र आहे असे बिंबवतात.आणि ते त्यात सध्या मोठ्या प्रमाणात यशस्वीही होत आहेत; असे वरवर पाहता दिसते.त्या अस्त्राला बोथट करायचे असेल तर आपणच समाजाला विचारांचे शस्त्र बनवायला आणि ते यशस्वीपणे चालवायचे प्रशिक्षण द्यायला हवे.
‘सर्व माणसे एकाच बापाची लेकरे आहेत.’
ही सर्वच धर्मांची शिकवण आहे. पण ती आचरणात कोणीच आणत नाही.त्यामुळे सर्वच धर्मांत असुरक्षिततेची भावना आहे.माझी नास्तिकता ही सर्व धर्मातील माणसांना आपले मानते, पण ही गोष्ट माझ्याही वागण्यात दिसत नसेल, तर सगळे मलाही त्यांचा शत्रूच समजतील. त्यामुळे माझ्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’मुळे ते दुरावणार नाहीत,याची काळजी मलाच घ्यावी लागेल आणि समता, बंधुता, आपुलकी, प्रेम यांच्या अभिव्यक्तीवर जास्त भर देऊन भविष्यात वाटचाल करावी लागेल.
(संकलित)

No comments:

Post a Comment