Wednesday, 25 March 2026

मला भावलेलं मुंबई चं रुप

   ◆ मला भावलेलं मुंबईचं रूप ◆

                


       ● मुंबई एक कामगार नगरी ●

                      आपल्या मातीशी जसं शेतकऱ्याचं घट्ट नातं निर्माण झालेले असतं तसंच काहीसं नातं आहे इथल्या मुंबईकराचे मुंबईशी. मुंबई या मायानगरीत आल्यावर प्रत्येक व्यक्ती त्या मायाजालात इतका अडकून जातो की पुन्हा सोडून जायचा विचार त्याच्या मनात कधीही येत नाही. हिच जादू आहे आपल्या मुंबईची. या मुंबईत येण्याचं एकमेव कारण काय असेल तर ही मुंबई कुणाही पामराला कधीही उपाशीपोटी ठेवणार नाही. म्हणूनच की काय कुणास ठाऊक सगळे पर्याय संपल्यानंतर शेवटचा उदरनिर्वाह करण्याचा पर्याय म्हणून आपल्या मुंबईकडे बघीतलं जातं. घड्याळाच्या काट्याप्रमाणे कधीही न थांबता इथला मुंबईकर या मायानगरीत कष्ट करत असतो. आणि स्वतः बरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाला संभाळत असतो.


       


       'मुंबई मेरी जान


        तुजपे दील कुर्बान'

हे इथला मुंबईकर मोठ्या अभिमानाने म्हणत असतो. आज जगातील अनेक ठिकणाहुन लोक कामानिमित्त मुंबईत ये-जा करत असतात हेच मुंबईचं. मोठेपण आहे. या मुंबईच्या जडणघडणीत मोठा वाटा कुणाचा असेल तर इथल्या नोकरदार वर्गाचा. देशाची आर्थिक राजधानी म्हणून जी काय बिरुदावली प्राप्त झालेली आहे याचं संपूर्ण श्रेय कुणाला जात असेल तर ते इथल्या कामगार वर्गाला. अगदी मुंबई ला साफसुथरी आणि सुंदर ठेवयायचं काम देखील हा कामगार वर्गच करत असतो. या कचरा कामगारांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत कारण त्यांच्यामुळे च तर मुंबईत निरोगी जीवन जगतोय. मुंबई नेहमी गजबजलेल्या अवस्थेत दीसते त्याचं मुख्य कारण आहे हा इथला कामगार वर्ग. पुरुषवर्ग जसा कामानिमित्त घराबाहेर पडतो त्याचप्रमाणे मुंबईतील स्त्रीवर्ग देखील कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो, हे इथले खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे एकंदरीत बघीतलं तर 'मुंबईतील कामगारवर्ग संपावर गेला तर' अशी कल्पना देखील आपण करु शकत नाही.


         


          'ही मुंबई नेमकी आहे तरी 


            काय'


            गरीबाला तारणारी आय, आणि


            कष्टकरऱ्यांची माय'

   गरिबांंपासून ते श्रीमंतांपर्यत प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचं महत्वपूर्ण कार्य ही मुंबई करत आली आहे, तीचं वर्णन करावं तेवढे थोडेच आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला कोणते ना कोणते काम मिळतेच मग तो शिक्षित असो किंवा अशिक्षित, रीकाम्या हाताने माणूस मुंबईतुन कधीही परतत नाही हे सुद्धा एक वैशिष्ट्य च मानायला हवं. कोणतंही काम करताना लाजु नये असं.नेहमी म्हटलं जातं पण याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला मुंबईत पहायला मिळते. अगदी गटारात उतरून गटारातील घाण काढायचं काम सुद्धा इथला कामगार मोठ्या अदबीने करतो यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही हे विशेष. मुंबईतील सगळ्या गोष्टींंचा सारासार विचार केला तर कामगाराविना मुंबई अगदी काही मिनिटात ओस पडेल म्हणून मुंबईचं जे काही रुप आपण मोठ्या अदबीने पहात असतो यात मोठा वाटा कुणाचा असेल तर निश्चितपणे इथल्या कामगारांचा.

          'मायानगरी ती अमुची,


          हा जन्म तीच्यासाठी,


          तीच अमुची करती, धरती


           जशी आंधळ्याची काठी'

        सकाळी उठल्यापासून घाईगडबडीत कामावर जाणारा प्रत्येक व्यक्ती जसा त्याच्या कुटंबासाठी, उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतो तसा तो कामाच्या काळजीने देखील बाहेर पडत असतो. म्हणजे कामगाराचे मुंबईतील असणारे अस्तित्व कुणीही नाकारु शकत नाही. संपूर्ण मुंबई च्या जडणघडणीत ला मुख्य दुवा, सुशोभीकरणाचा 'हिरा' कोण असेल तर तो इथला कामगार, हे मी अगदी ताठमानेने ठामपणे सांगु शकतो.


           छोट्यामोठ्या उद्योगधंद्यांपासुन ते छोट्यामोठ्या उद्योगपतींंपर्यंत सगळ्यांच मुंबई हेच. माहेरघर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज बघायला गेलो तर सगळ्या उद्योगांचे बस्तान. हे कुठे बसवलं असेल तर तर ते मुंबईत त्यामुळे गावातील, खेड्यापाड्यातील तरुणांपासुन ते अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा या मुंबईकडे आकर्षली आहे. मुंबईची जी शान टिकून आहे ती या कामगारांमुळेच हे शाश्वत सत्य कधीही नाकारुन चालणार नाही. 


               स्वप्ने उराशी बाळगून इथे प्रत्येकजण आपापल्या परीने येत असतो आणि या स्वप्न पूर्तीसाठी फक्त आणि फक्त ईथे येऊन काम करत असतो. मुबईतील कामगार हाच मुंबई चा तारणहार आहे. त्याच्याशिवाय मुंबईतील पहाट उजाडणार नाही हे मान्य करावेच लागेल. असंख्य गोरगरिबांना काम मिळवून देण्यासाठी व याच कामगारांना आपल्या पोटात सामावून घेणारी ही मायानगरी कामगारांचे पाठबळच म्हणायला हवे. प्रत्येकाच्या हाताला काम देऊन ताठ मानेने जगण्याचं धाडस या मुंबईने करून दिले आहे. 


           'मी मुंबईकर या मायानगरीतला


            मी कामगार या मुंबईचा,


             कधी बंध ना तुटो या 


            आपुलकीच्या नात्याचा'


(स्मार्ट महाराष्ट्र या पोर्टल वर तृतीय पारितोषिक विजेता , निबंध)

                           निळकंठ शां. तांबे


                            मुंबई मालाड


                            9260797072


No comments:

Post a Comment